नाटक वास्तवाचे दर्शन असते, वास्तव नव्हे : आळेकर   

सातारा,(प्रतिनिधी): नाटक हे वास्तवाचे दर्शन असते, वास्तव नव्हे, असे प्रतिपादन अभिनेते सतीश आळेकर यांनी व्यक्त केले. वाई वसंत व्याख्यानमालेच्या तृतीय पुष्पात नाट्य सिनेमामधील एक प्रवास या विषयावर लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या संचालिका डॉ. रूपाली अभ्यंकर त्यांची प्रकट मुलाखत घेतल्या. आळेकर म्हणाले, प्रत्येकाचेच बालपण कुठे ना कुठे गेलेले असते. काही संस्कार जवळचे वाटतात तर काही लांबचे. प्रत्येक लेखकाच्या मनात स्वतः च गाव असतं कधी ते कल्पनेतले असते आणि कल्पनेला सीमा नसतात. न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमध्ये शिकत असताना माझे पहिले नाटक झाले. ’दुरितांचे तिमिर जावो’ या पहिल्या नाटकात भी नट नव्हे तर मदतनीस होतो. विंगमध्ये बसून नाटक पाहताना नाटक किती आभासी आहे हे कळाले. महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले आणि मेडिकलच्या परीक्षेत अपात्र ठरलो. नैराश्यात असताना भालबा केळकर यांच्या अ‍ॅपीथेटरमधल्या नाटकाच्या प्रयोगात दिलू नावाचे एक पात्र करण्याची संधी मिळाली. नाटकात मिळालेल्या प्रेक्षकांच्या टाळ्यांनी मी गमावलेला आत्मविश्वास परत मिळवला. आणि तेव्हा मला ’थिएटर इज लाईक थेअरपी’ या वाक्याचा अनुभव आला. भालबा केळकरांबरोबर काम करताना दिग्दर्शक कसा असावा हे समजले आहे.
 
आळेकर म्हणाले, विचारांमधील अवतरणांचे भान नाटककाराला असावे लागते. घाशीराम कोतवाल या नाटकाचे प्रयोग अगदी जर्मनीत जाऊन केले. घाशीराम कोतवालचे अमेरिकेत १७ युरोपमध्ये ३० तर एकूण ५०० हून अधिक प्रयोग केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये ललितकला केंद्र विभागाचे प्राध्यापक म्हणून काम करताना नवा अभ्यासक्रम तयार केला. संगीत नृत्य नाट्य यांची सांगड घातली. अभिनय हा नटात असावा लागतो तो सरावाने फुलवता येतो. नट होण्यासाठी खर्‍या खोट्या भावना क्षणार्धात दाखवाव्या लागतात. असा साक्षात्कारिक क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात यावा लागतो. विचारांमधील अवतरणांचे भान नाटककाराला असावे लागते.

Related Articles